गुणवत्तापूर्ण कामातून नवनियुक्त उमेदवारांनी विभागाची प्रतिमा उंचवावी – मंत्री रवींद्र चव्हाण

0 31

मुंबई, दि. ७ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे देशाच्या, राज्याच्या पायाभूत विकासात उल्लेखनीय योगदान असून या महत्वपूर्ण विभागात काम करण्याची संधी नवनियुक्तांना मिळाली आहे, या संधीचा सन्मान करत आपल्या गुणवत्तापूर्ण कामातून विभागाची प्रतिमा नव नियुक्तांनी उंचवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध संर्वगातील सरळसेवा भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्या सोहळ्यात श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (बांधकामे) एस.दशपुते, मुख्य अभियंता रणजित हांडे उपस्थित होते.

मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणारे पायाभूत विकास काम राज्याच्या प्रगतीला गतिमान करणारे आहे. या विभागाला भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या सारख्या ज्येष्ठ अभियंत्याचा वारसा लाभलेला आहे, तो लक्षात घेऊन नवनियुक्त उमेदवारांनी आपल्या पदाची जबाबदारी समजून घेत त्यात जास्तीत जास्त उत्कृष्ट काम करण्याचा संकल्प आजच्या आपल्या नियुक्तीच्या दिवशी करावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणात गुणवत्ततेच्या निकषावर पदभरती राबवण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाने अतिशय वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने अवघ्या अडीच तीन महिन्यात ही संपूर्ण पदभरती प्रक्रिया राबवत विभागाची गतिमान कार्यपद्धती अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सर्व नवनियुक्तांनी पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी, कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामातून थेट नागरिकांसाठीच्या सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येतात. देशाच्या नागरिकांसाठी काम करण्याची  संधी देणारा हा विभाग आहे, त्यामुळे आपली जबाबदारी देखील मोठी आहे,कारण प्रत्यक्ष क्षेत्रीय ठिकाणी चांगले काम करत विभागाची प्रतिमा अधिक चांगली बनवण्याचे मोठे काम हे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यंत्रणेमार्फत होत असते. त्यामुळे आपण विभागाचे प्रतिनिधित्व करत असता हे लक्षात घेऊन अधिक चांगले काम करण्याचे आवाहन मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी केले.

श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, विभागाची गुणवत्ता ही ओळख बनवण्याच्या आपल्या संकल्पात नवनियुक्त उमेदवारांचा सक्रिय सहभाग हा विभागाच्या कामाला अधिक उंची देणारा ठरेल, शिवाजी महाराजाच्या गड किल्ल्यांच्या रुपाने महाराष्ट्राकडे गुणवत्तेचा भरभक्कम वारसा  आहे, त्याची प्रेरणा घेत सर्वांनी गुणवत्तेला प्राधान्य देत काम करावे, देशाच्या अमृतकाळात काम करण्याची संधी या सर्व उमेदवारांना मिळत आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेत  सर्वांनी आपल्या परिने अधिकाधिक  योगदान द्यावे.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध संर्वगातील सरळसेवा भरती प्रक्रिया मुख्य अभियंता, मुंबई कार्यालयामार्फत राबवण्यात आली. त्यातील पात्र एकूण १५१८ उमेदवारांना आजच्या दिवशी राज्यातील विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात येत आहेत. मुंबई येथे मंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते ४५ उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती, सचिव श्री. दशपूते यांनी प्रास्ताविकात दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एकूण मंजूर पदे १९ हजार ७६६ एवढी असून त्यापैकी १३ हजार ०६८ पदे (६६%) भरलेली होती. अराजपत्रित २१०९ एवढ्या पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली होती. भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीची परीक्षा घेण्यासाठी निवड करण्यात आली. सदर निवड प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात आली. उमेदवारांची परीक्षा घेणे ते अंतरीम निकाल घोषीत करणे नंतर उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी करून अंतिम निवड यादी घोषित करण्याची कार्यवाही अडीच महिन्याच्या आत करण्यात आली. निवड यादी घोषित झाल्यानंतर दोन आठवड्याच्या आत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. विक्रमी वेळेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही केल्याची माहिती सचिव श्री. साळुंखे यांनी यावेळी दिली.

तत्पर भरती प्रक्रिया राबवून अवघ्या तीन महिन्यात निुयक्ती पत्र देण्याच्या गतिमान कार्यपद्धती राबवल्याबद्दल नवनियुक्त उमेदवारांनी यावेळी शासनाचे आभार मानले.

०००

वंदना थोरात/विसंअ

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.